जळगाव/मुंबई : आज हवामान विभागाकडून राज्यांतील विविध जिल्ह्यांना कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यात आजच्या दिवसासाठी जळगाव जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
दरम्यान, आज राज्यांतील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.
आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.