चले वाते चलं चित्त निश्चले निश्चलं भवेत्|
योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायु निरोधयेत ||
वायूचा निरोध केला की चंचल असे मन पण निश्चल होते. त्यासाठी प्राणायामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे.
हटयोग मध्ये द्वितीय उद्देशामध्ये प्राणायामाचे महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम नाडीशोधन म्हणजे आपल्या शरीरातल्या ७२ हजार नाड्यांची शुद्धी होणे आवश्यक आहे कारण यातूनच प्राणशक्तीचे वहन होते. नाडी ह्या प्राणवहनक्षम होण्यासाठी नाडी शुद्धी प्राणायाम आधी करावा असे सांगितले आहे. डाव्या बाजूला चंद्रनाडी तर उजव्या बाजूला सूर्यनाडी म्हणतात.
प्राणायाम करण्यासाठी आहाराचेही नियोजन केलेली आहे. कोणकोणते पदार्थ सेवन करावे, किती वेळा करावे, किती मात्रेत करावी याचै सर्व वर्णन यात दिलेले आहेत. तसेच पथ्यकर अपथ्यकर काय आहे हे देखील सांगितले आहे.
आयुर्वेदात आहाराचा एक गुरुमंत्र दिलेला आहे. तो म्हणजे आपले जठराचा अर्धा भाग घण आहाराने व्यापलेला असावा. उरलेल्या अर्ध्या भागापैकी पाव भाग पाण्याने आणि पाव भाग रिकामा असावा. जठर हे मिक्सरचे काम करते. जसे मिक्सर मध्ये एखादी पदार्थ बारीक करण्यासाठी जर आपण संपूर्ण त्याच्या तोंडापर्यंत भांडे घण पदार्थाने भरले तर तो पदार्थ बारीक होत नाही आणि मिक्सर वर लोड येऊन ते खराब होऊ शकते. मग आपण अर्धाच भाग घनपदार्थांचे भरतो त्यात योग्य मात्रेत पाणी टाकतो आणि भांड्याचा काही भाग रिकामा ठेवतो. त्यावेळेस त्यातील पदार्थ पूर्ण बारीक होतो. मग जठर हे शरीराचे मिक्सर आहे.
आपण घेतलेले अन्न पूर्णपणे बारीक होऊन पचनास योग्य होण्यासाठी आहार असाच घ्यावा म्हणून जुने लोक म्हणतात की दोन घास कमी जेवावे.
तुम्ही घेतलेल्या आहाराचे पूर्ण पचन होऊन शरीराची तृप्ती होत असेल तर तुमचे मन विचलित राहत नाही. कारण की शारीरिक व्याधी होत नाही आणि ते प्राणायामासाठी योग्य राहते.
प्राणायामाचे परिणाम:-
प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण, मनशांती व मज्जासंस्थेचे संतुलित कार्य ही नियमित प्राणायामाची परिणती होय. प्राणायामाने शारीरिक व मानसिक सहनशीलता वाढते.
हटयोग प्रदिपिकेत सांगितले आहे.प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत अचूक प्राणायाम सर्व रोग नष्ट करते.
योग्य श्वास नियंत्रणाने नाडीचे स्पंदने स्थिर व नियमित होतात.
शरीर लवचिक व त्वचा तेजस्वी बनते…
पतंजलि ऋषी म्हणतात
तत: क्षीयते प्रकाशावरम्धा रणासुच योग्यता मनस:
प्राणायामामुळे मन शुध्द होते. अंतर्मनाचे तेज झाकणारे आवरण लुप्त होते व ते मन धारणेसाठी सज्ज होते.
प्राणायामाची व्याप्ती खूप मोठी आहे. शुद्धीकरण इडा पिंगला सुषुम्ना नाडी मधून प्राणाचे वहन. हे सर्व नित्य प्रयासाने साध्य होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.
योगा जरी म्हटलं तरी एखादी आसन एखादी क्रिया जर शरीरात मध्ये पीडा उत्पन्न करीत असेल तर ते आसन किंवा ती क्रिया करू नये. प्राणायाम करताना जर तुम्हाला घाम सुटत असेल, हृदयाचे नाडीचे ठोके अनियमित पडत असतील तर ते चुकीचे प्राणायाम होते तिथेच थांबावे.
आचरण:-अन्नग्रहण करताना ताटात जर गोड पदार्थ असेल किंवा ज्याची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तर आधी तो पदार्थ खावा. उदा. भात आंबट गोड नंतर बाकीचे अन्न घ्यावे.
विश्लेषण:- भुकेची संवेदना आपल्याला तेव्हाच होते जेव्हा रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते आणि आपल्या मेंदूला सतत कार्यरत ठेवण्यासाठी ही शर्करा आवश्यक असते. जेवताना सुरुवातीलाच आपण जर गोड पदार्थ खाल्ला तर इतर जेवण होईपर्यंत त्यातील शर्करा रक्तामध्ये भिणते व मेंदूला तरतरीत होण्यासाठी शर्करेचा पुरवठा होतो. ज्यावेळेस मेंदूला पुरेशी शर्करा ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो मिळते त्यावेळेस आपल्याला ‘सटायटी’ म्हणजे तृप्तीची भावना होते आणि पोट भरण्याचा सिग्नल आपला मेंदू पाठवतो.
जर संपूर्ण जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ जर खाल्ला तर इतर पदार्थातील म्हणजे पोळी भाजी यातील जी शर्करा असते ती शरीरामध्ये घेण्यासाठी वेळ लागतो आणि आपलं पोट भरलं नाही असं आपल्याला वाटतं. कारण मेंदूपर्यंत शर्करा पोहोचलेली नसते तोपर्यंत मेंदू तृप्तीची भावना कळवत नाही. आणि आपण ओव्हरिटिंग करत राहतो.असे गरजेचे नाही की तुम्ही रोजच् गोड पदार्थ खा.एक मात्र लक्षात ठेवा ज्यावेळेस भुकेची भावना होते त्यावेळेस लगेच अन्नग्रहण केलं तर आरोग्य जास्त चांगलं राहत.
क्रमशः
साहित्यसंपदा,सुवर्ण जीवनप्रवास
डॉ सुवर्णा पाटील भडगाव















