जळगाव, दि. 20 – जागतिक बँक अर्थसहाय्यीत कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 7 वर्षे कालावधीत अंमलबजावणीकरीता शासनाची मान्यता प्राप्त आहे. स्मार्ट प्रकल्पाचे उद्दिष्ट्ये राज्यातील अल्पभुधारक शेतकरी व कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवुन समावेशक आणि स्पर्धात्मक शेतमाल मुल्यसाखळयांच्या विकासाला मदत करणे हे आहे. ते साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य, पायाभुत सुविधा आणि जोखिम निवारण क्षमता विकसीत करण्यासाठी गुतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पारंपारीक कृषि व्यवस्थेचे बळकटीकरण करुन तो अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणे आणि मुल्यसाखळीतील खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे यावर भर असणार आहे.
त्याअनुषंगाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज हे शेतमाल, शेळया आणि परसबागेतील कुक्कूटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासांठी आहेत. मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प (productive partnerships) आणि बाजार संपर्क वाढ (Market Access plan) उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉपॉरेटस/प्रक्रियादार/लघु, मध्यम उद्योजक/ स्टार्टअप्स/कोणताही खरेदीदार इ. चा समावेश आहे.
त्यानुसार प्राप्त होणा-या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ठ अर्जांना प्रकल्पाचे 60% पर्यंत अनुदान उपलब्ध होईल. अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart_mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज 15 डिसेंबर, 2020 सायंकाळी 5.00 पर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000