
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात आलेल्या निनावी पत्राने खळबळ उडाली असून याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे.
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यलयाला शुक्रवारी एक निनावी पत्र मिळालं. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे धमकी दिल्याने मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अज्ञाताचा शोध घेत आहेत.














