काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना जाहीर सभेमध्ये येत्या १० मार्च रोजी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार बाबत जाहीर केलं आहे दरम्यान होणारा मंत्रीमंडळ फेरबदल हा राजकीय भूकंप असेल असंही नाना म्हणालेत.
या राज्यांचा विधानसभा निकाल १० मार्च रोजी
उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत, नेमकं त्याच दिवशी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूचक विधान पटोले यांनी केल्याने राजीकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीतील इतर नेते मात्र यावर गप्प
महाराष्ट्रामध्ये १० मार्च रोजी राजकीय भूकंप येणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मोठे बदल लवकरच दिसून येतील असा दावा पटोले यांनी आपल्या भाषणात केला असला तरी अद्याप महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत जाहीर पणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
महाविकास आघाडीतील तीन नंबरचा पक्ष
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात लहान पक्ष हा काँग्रेस आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांच्या या दाव्यावर सरकारमध्ये सत्तेत असणारे इतर दोन मोठे पक्ष काय भूमिका घेतात हे देखील येत्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.














