जळगाव । जळगाव शहर मनपातील भाजपच्या ४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा दोन नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले आहे. आज हसीनाबी शेख शरीफ आणि उषा संतोष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भाजपच्या २८ नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.
शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर ललित कोल्हे यांची खेळी यशस्वी झाली असून काल चार आणि आज दोन नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.














