भुसावळ : ‘इंडिया’ आघाडी म्हणजे डबे नसलेली गाडी आहे. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन, उद्धव म्हणतात मी इंजिन, शरद पवार म्हणतात, मी इंजिन! इंडिया आघाडीतील सर्वचजण इंजिन बनू पाहत आहे. या सर्वाच्या इंजिनमागे सामान्यांसाठी डबेच नाहीत अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत केली.
रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात आयोजित सभेतफडणवीस पुढे म्हणाले, ‘निवडणूक निकालानंतर भाजपवाल्यांना बिळातून बाहेर काढून त्यांचा समाचार घेऊ,अशी वल्गना करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःबिळातून बाहेर आले नाहीत. कोविडच्या काळातही त्यांनी भ्रष्टाचार केला. अशा खिचडीचोर आणि कफनचोरांना तुम्ही प्रतिसाद देणार का,’ असा प्रश्न त्यांनी मतदारांना विचारला.ते म्हणाले की, इंडिया आघाडीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भक्कम गाडी धावतेय. विरोधक अॅड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतही टीका करत आहेत; परंतु आम्ही निकम यांच्यासोबत असून योग्य व्यक्तीला उमेदवारी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.









