मुंबई । राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे,
राज्यातील कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय पुणे आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबईत आज पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
4 July, राज्यात सध्या पावसांची स्थिती,
कोकण, मध्य महाराष्ट्र मधील काही भाग वगळता, राज्याला अ९ूनही मोठ्या पावसांची गरज.
IMD Forecast प्रमाणे जुलै महिन्यात चांगल्या पावसांची शक्यता
ये रे पावसा… pic.twitter.com/5XLbfaUasu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2023
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. जुलै महिना उजाडला तरी देखील जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस नाहीय. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
दरम्यान, संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात ८ जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.