कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंद पुकारल्यानंतर शिवसेना हादरून गेली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा लागला होता. तर एकनाथ शिंदे गट यांनी भाजपसोबत जाऊन नवीन सरकार स्थापन केलं आहे. दरम्यान, यानंतर शिंदे गटाकडून शिवसेला एकापाठोपाठ धक्के देणे सुरु आहे. आता अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. आज याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेने भगवा फडकवताना मंडलिक आणि माने यांना निवडून दिले. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत येऊ लागली, पण दोघांनीही आपण शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.
हे पण वाचा..
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात लवकरच 30 रुपयाची घसरण होणार
प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे रुळावर पडला, तेव्हड्यात भरधाव येत होती ट्रेन, मग….पहा व्हायरल Video
जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
संजय मंडलिक यांनी चार दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता जे राहिले ते अस्सल सोनं आहे, असं म्हणत आपण शिवसेना सोडणार नाही अशी घोषणाच केली. पण त्यानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला आणि कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारली. दुसरीकडे, धैर्यशील माने मातोश्रीला गेले मात्र कोल्हापूरच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार अशी चर्चा जोरात सुरू झाली. त्यामध्ये आता मंडलिक यांचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.