चाळीसगाव,(प्रतिनिधी)- वृद्ध आईची विचारपूस केली… भेट घेऊन रेशनींगचे धान्य घेऊन हल्ली राहत असलेल्या गावाला जाण्यासाठी परतीला निघालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील विजय बळीराम शिरसाठ नामक तरुणाचा अपघातात दृदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर असे की धुळे रस्त्यावरील मोहाडी गावाजवळ विजय बळीराम शिरसाठ हा तरुण सकाळीसच धुळ्याहून आईला भेटण्यासाठी व रेशनींगचे धान्य घेण्यासाठी वरखेडे येथे आला होता. मात्र त्याची ही भेट शेवटची ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
विजय शिरसाठ हा तरुण धुळे येथे कुटुंबासह राहत होता. वरखेडे येथे घरी वृद्ध आई एकटी राहत होती. आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी शनिवारी सकाळी ७ वाजता विजय वरखेडे गावी आला. आईची भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस करुन रेशनचे धान्य घेऊन तो सकाळी १० वाजता आपल्या दुचाकीने धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाला. मोहाडीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने विजयचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर वरखेडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत विजय शिरसाठ याची घरची परिस्थिती गरिबीची होती. धुळ्यात तो मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता. मात्र त्याच्या अपघाती मृत्युने कुटुंबाचा आधारच गमावला असुन कुटूंब उघड्यावर पडले आहे.