नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद संसदेतही उमटताना दिसत असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना सभागृहात तिसऱ्या रांगेतून थेट पाचव्या रांगेत आसन देण्यात आल्याने त्यांनी याविरुद्ध थेट सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे धाव घेतली आहे.
राज्यसभेतील जागा अचानक बदलण्यात आल्याने संजय राऊत यांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे तसेच मला व शिवसेनेला अपमानित करण्यासाठीच माझी जागा बदलण्यात आली आहे, असा आरोप राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
राज्यसभेत मी तिसऱ्या रांगेत बसत होतो मात्र अचानक त्यात बदल करून मला पाचव्या रांगेत आसन देण्यात आले आहे. आसनव्यवस्थेतील हा बदल आश्चर्यकारक आहे. कुणीतरी जाणूनबुजून शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार केला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असताना राज्यसभेत शिवसेना सदस्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि या सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारी ही बाब आहे, असेही राऊत यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.
संजय राऊत यांनी राज्यसभेत बदलण्यात आलेल्या आसनव्यवस्थेवर आक्षेप घेतानाच पुन्हा एकदा आपल्याला सन्मानाने पहिल्या, दुसऱ्या वा तिसऱ्या रांगेत आसनस्थ होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सभापतींकडे केली आहे. यावर सभापती कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यसभेतील आसनव्यवस्था सभापती ठरवत असतात. याबाबतचे नियम राज्यसभेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.














