सोलापूर : शेतामध्ये खर्च करूनही उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ याठिकाणी घडली असून मनोज राजाराम गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मनोज राजाराम गायकवाड हा मोहोळ तालुक्यातील मोहोळ-नरखेड रस्त्यावरील गायकवाड वस्तीत आपले वडील आणि आजीसोबत राहत होता. त्याला याठिकाणी पाऊण एकर शेती होती. शेतीत मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मनोज याला नैराश्य आलं होतं. मागील काही वर्षांपासून दिवसरात्र शेतात कष्ट करूनही शेतीत फारसं उत्पन्न मिळत नसल्याने तो तणावात होता.
याच कारणातून त्यानं मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.














