जळगाव | आजपासून धनत्रयाेदशी सुरु झाली आहे. ती लक्षात राहावी म्हणून प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. दिवाळीनंतर सार्वजनिक ठिकाणी जसे माॅल, रेल्वे, बसने प्रवास करताना लसीकरण केले आहे की नाही, हे तपासले जाणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवेशबंदी केली जाईल. ती वेळ येऊ नये .ज्यांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली नसेल त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात साेमवारी काेराेनाबाधित नवीन एकही रुग्ण समाेर आला नाही. सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू आहे. काेराेना नियंत्रणात आल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या फक्त नऊवर आहे. त्यात लक्षणे नसलेले आठ तर एक लक्षणे असलेला रुग्ण आहे. रिकव्हरी रेटही ९८.१८ टक्के झाला आहे. टेस्ट करून तपासणीसाठी पाठवलेले ५२६ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
तर जिल्ह्यात आतापर्यंत 27 लाख 72 हजार 4 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 20 लाख 73 हजार 924 जणांना पहिला डोस तर 6 लाख 98 हजार 80 जणांना दुसरा डोस देण्यात आले आहे.














