मुंबई – महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाआघाडी आकाराला येत असतानाच, नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतं यामुळं सस्पेन्स आणखीनच वाढला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज, मंगळवारी होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं ही सत्ताकोंडी नेमकी फुटणार कधी, असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सर्वसामान्यांनाही पडला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक होणार होती. ती उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते व्यग्र आहेत. त्यामुळं ही बैठक उद्या होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीत काल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची होणारी बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे. त्यामुळं काँग्रेसचे नेते विविध कार्यक्रमांत व्यग्र आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानं संभ्रम – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात काल, सोमवारी बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ राजकीय परिस्थितीबाबत बोलणं झालं, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळं शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा विचार करणाऱ्या शिवसेनेच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे.















