मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर — आई वडिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल समाजात मुश्किल होईल किंवा आई वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कोणतेही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये असे वचन मुला मुलींनी आज रोजी दिले पाहिजे त्यासाठी आजच्या काळात प्रत्येकाने विशेषतः मुलींनी त्यांचे चारित्र्य सांभाळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांनी मुक्ताईनगर येथे केले.विनोद भाऊ सोनवणे मित्र परिवार योगराज फाउंडेशन तर्फे आयोजित विद्यार्थी तसेच पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज बोलत होते. सदर कार्यक्रम मुक्ताईनगर येथील जिजाऊ नगर वार्ड क्रमांक 12 येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज माहेरची साडी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल , मराठी टीव्ही सिरीयल मधील अभिनेता भाग्येश पाटील मध्य प्रदेशातील खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील तसेच बुऱ्हानपूर चे माजी महापौर अतुल भोसले , प्रमोद सोनवणे, नामदेवराव सोनवणे , सौ.वत्सलाबाई नामदेवराव सोनवणेची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक योगराज फाउंडेशनचे संचालक तथा मुख्य आयोजक विनोद सोनवणे यांनी केले. विनोद सोनवणे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले आहे परंतु समाजातील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी परिस्थितीमुळे मागे पडता कामा नये त्याला प्रोत्साहन मिळावे तसेच त्याला मदतीचा हात देण्यासाठी मी स्वतः तसेच योगराज फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले यानंतर अभिनेता भाग्येश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भविष्यात खडतर प्रवास असताना प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होईल अशी एकही चूक आपल्या हातून घडता कामा नये असा महत्त्वाचा सल्लाही दिला जीवनात कोणतेही गोष्टीकडे आकर्षित होऊ नका जीवनात मित्र निवडताना खूप काळजी घ्या. लव मॅरेज साठी माझा विरोध नाही. परंतु जीवनाचा साथी आपल्या जीवनासाठी पात्र असाच असावा.आपले आई-वडील आपले दैवत आहे.त्यामुळे ते सदैव आपला हितच पाहतात याची सदैव जाणीव ठेवावी हे विसरता कामा नये असेही माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले.
याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी च्या 81 , इयत्ता बारावी च्या 50 , नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बारा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच जळगाव येथून आलेले टीव्ही चॅनलचे सर्व पत्रकार यांचा पुष्पगुच्छ , शाल व स्मृतीचिन्ह देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार आर बी महाजन यांनी मानले.









