अमळनेर – येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन दि.23 व 24 नोव्हेंबर रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. राजन गवस तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक कौतिक कोळी असतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील असून स्वागताध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे असणार आहेत.
याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ. रणधीर शिंदे -कोल्हापूर, डॉ. विद्या पाटील जळगाव, अशोक सोनवणे -चोपडा, ज्योतीराम कदम -पुणे, रमेश पवार मूख्याधिकारी शोभा बाविस्कर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दि 23 रोजी दुपारी 1 ते 2.30 या वेळात ग्रंथ दिंडी, दुपारी 3 ते 4 वेळात उद्घाटन सोहळा, दुपारी 4.30 ते 7 परिवर्तन जळगाव निर्मित अभिवाचन, रात्री 7.30 ते 9 कविसंमेलन असे कार्यक्रम होतील.
दि.24 रोजी सोलापूर येथील ज्येष्ठ कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9.30 ते 11 या वेळात कथाकथनाचा कार्यक्रम होईल. दुपारी11.30 ते 2 वेळात मन्ही अहिराणी ना गोडवा, दुपारी 2.30 ते 3.30 वाजता ग.स.बँकेचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे यांचे अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल.
यावेळी पुणे येथील उद्योजक मिलींद भांडारकर, म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, स्वादिष्ट नमकीनचे संचालक अशोक लोटन पाटील, खा.शि.मंडळाच्या विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
दुपारी 4.00 ते 5.30 वाजता वरळी मुंबई येथील शाहीर चिंतामणी शिवडीकर यांचा दर्याची लेकरं हा पारंपारिक लोकगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.














