खानदेशातील, जळगावला राहून त्या जळगावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे संस्थापक डॉ.भवरलाल जैन यांना जाते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा आवाका जेव्हा मुंबई-पुण्यापलीकडे कल्पिला जात नव्हता तेव्हा भवरलालजींनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात घातला. शेती, शेतकरी आणि शेतीसंबधी उद्योगात हाडाची काडे करण्याची बांधिलकी मानली. पाश्चिमात्य देशांतले ठिबक सिंचनासारखे तंत्रज्ञान डोळसपणाने भारतीय मुशीत घालून शेतक-यांना उपलब्ध करुन दिले. स्वत: शेतकरी असल्याने, पिढ्यांन् पिढ्या शेती करणाऱ्या घरात जन्म घेतल्याने त्या व्यवसायाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांचा हा कृषि वारसा त्यांच्या नंतरच्या पिढीने देखील जपलेला आहे. भवरलालजी जैन यांचा १२ डिसेंबर २०२० रोजी ८३ वा जन्म दिवस. या दिवसाच्या औचित्याने जैन हिल्स स्थित असलेल्या कृषि पंढरीचे निर्माता असलेल्या या महान व्यक्तित्वाबाबत…
आपल्या आईच्या सल्यानुसार शेती क्षेत्रात कार्य करायचे ठरले आणि जैन ब्रदर्सची मुहूर्तमेढ अवघ्या सात हजार रुपयांच्या मूळ भांडवलावर १९६३ ला रोवली गेली. सुरवातीला १९६३ ते ७८ या काळात कंपनीकडे ६५ कंपन्यांच्या एजन्सी होत्या. शेती, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तुंचा व्यापार या माध्यमातून होत होता. १९७८ मध्ये एक बंद पडलेली फॅक्टरी घेऊन कंपनीने पपयाची पावडर बनविण्याचे काम सुरू केले. त्यातूनच औद्योगिक क्षेत्रात प्रवेश झाला. एवढा एक इतिहास आपल्यासमोर ठेवला. सात हजार रुपयांपासून १९६३ ला सुरूवात झाली. एका एजन्सीपासून सुरूवात झाली. १९७८ पर्यंत ६५ एजन्सीज् पर्यंत पोहोचले. प्रत्येक प्रॉडक्टमध्ये जळगाव जिल्ह्यात अथवा महाराष्ट्रात पहिल्या तीन मध्ये काम करण्याचा प्रयत्न असायचा व अथक परिश्रमाने पहिल्या तीनमध्ये कंपनीची एजन्सी असायची. जे काही काम करू ते उच्च कोटीचे करायचे, पहिल्या तीन मध्ये आपण असलो पाहिजे. असा भवरलालजींचा कटाक्ष असे. त्या पद्धतीने नेहमी वाटचाल असायला पाहिजे, फक्त विचार नव्हे तर कृतीही ते करत होते. सहकारी तत्त्वार केळीची पावडर तयार करणारी सुविधा असलेली पण बंद असलेली फॅक्टरी मोठ्या कौशल्याने सुरू करून त्यातून पपयाची पावडर बनविणे सुरू केले. त्या पावडरला पपेन म्हटले जाते. ती पावडर कंपनी विदेशात निर्यात करू लागली. १९७६-७९ पर्यंत कंपनी गरवारे, केमप्लास्ट इत्यादी दुसऱ्या कंपनीचे पीव्हीसी पाईप शेतकऱ्यांना विकत होती. शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत पाईपचा पुरवठा करण्यास या कंपन्या असमर्थ ठरल्या त्यामुळे आपण स्वतः पाईपचे उत्पादन करून शेतकऱ्यांची पाईपची गरज पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पपया पावडर बरोबरच कंपनीने पीव्हीसी पाईपचेही उत्पादनही सुरू केले.
१९७८ मध्ये जेव्हा कंपनीने औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केला. पपयाच्या पावडर बनवायला सुरवात केली. यासाठी लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांकडून मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली. कंपनीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये प्रवेश केला. पपयासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बऱ्हाणपूर या भागातून शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून कंपनी त्यांना पपई लावायला प्रोत्साहन देत असे. शेतकऱ्यांनी पपई लावायची, ठरलेले भाव असायचे. त्यांना पपयाचे चीक काढण्यासाठी सर्व सुविधा असायच्या. त्याचा अनुभव कंपनीच्या पाठीशी आहेत. १९९५ मध्ये कंपनीने फळप्रक्रियामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला, त्यावेळला शेतकऱ्यांना आपण फक्त रॉ-मटेरियल पुरवायचो. पाईप, ठिबक दिले यावर न थांबता दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी तंत्रज्ञान ही पुरवायचा. शेतकऱ्यांकडून तो माल घ्यायचा व त्यावर प्रोसेसिंग करायचा. तो विदेशात अथवा भारताच्या बाजारपेठेमध्ये द्यायचा या संकल्पनेतून भवरलालजींनी हे सगळे उभे केले.
भवरलाल जैन दिवसाचे किमान बारा तास काम केल्याशिवाय झोपत नसत. त्यांची एकाच वेळी शंभर जणांना कामाला लावण्याची हातोटी अनोखी होती. ते नव्या आर्थिक धोरणांबाबत मूलभूत मतभेद नोंदवत. राष्ट्रीय आर्थिक विकासाचा विचार ते स्वतंत्र पध्दतीने करत. त्यासाठी कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक असावे अशा विचारांचा ते पुरस्कार करत असत. त्यांना भारत हा महासत्ता बनू शकेल असा आत्मविश्वास होता. त्यासाठी अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होण्याबाबत ते सुचवत. भवरलाल जैन ‘कायद्याचे जंजाळ म्हणजे प्रगती नव्हे’ असे स्पष्ट विचार त्यांनी आपल्या चिंतनातून मांडले. एका आयुष्यात कृषि क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करून भवरलाल जैन यांचे 25 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झाले व त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा या पवित्र आणि कर्तृत्ववान कृषि पुरुषाला मानाचा मुजरा…















