- लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात
- ६९ हजार गुन्हे दाखल
- १०० नंबर वर ७७ हजार फोन
२कोटी ६३ लाखांचा दंड
मुंबई दि.२५- राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २४एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल झाले असून १४,९५५ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ६३ लाख(२ कोटी ६३ लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला.अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७७,६७० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०८४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ४५,१६८वाहने जप्त करण्यात आली .
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १४८ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने १५पोलीस अधिकारी व ८१पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या १२ पोलीस अधिकारी व ७७ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.