मुंबई – महाआघाडी सरकारचेखातेवाटप पक्षांप्रमाणे निश्चित झालेले आहे. उद्या किंवा परवापर्यंत ते जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या भाजपवरही उद्धव यांनी निशाणा साधला.
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या मंत्रिमंडळात असून ही एक ‘बेस्ट टीम’ आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार का, असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकमताने खातेवाटप निश्चित केले आहे. त्यामुळे कोणते खाते कोणाकडे जाणार, याची अधिक चर्चा नको. उद्या किंवा परवा तुम्हाला ते कळेलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भिंती रंगवण्याचे काम आम्ही करत नाही!
आजच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत विचारले असता, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळात घराणेशाहीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, त्यावर बोलताना ‘आम्ही जे करतो ते रोखठोकपणाने आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला.