अहमदनगर – मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, मला दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे. माझे काही बरेवाईट झाले तर त्याला मीच जबाबदार राहीन’, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार विराजमान झालं आहे. या सरकारला जवळपास एक महिना पूर्ण होत आला असून नव्या सरकारने राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने राज्यातील ९० मान्यवरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला व आवश्यकतेनुसार सुरक्षेत बदल केले आहेत. यात अण्णा हजारे यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णा हजारे यांना आधी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यात बदल करून आता झेड सुरक्षा देण्यात आली आहे.