जयपूर – नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी आजवर त्यांना देवाच्या अनेक अवतारात पाहिलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही आता त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. चौहान यांनीही मोदींची तुलना देवाशी केली आहे. ‘भारतातील निर्वासितांसाठी मोदी हे देवासारखेच आहेत,’ असं चौहान यांनी म्हटलं आहे.
सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत एका सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली आहे. ‘भारताच्या शेजारी देशांमध्ये नरकयातना सहन करणाऱ्या नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साक्षात देव बनून आले आहेत. ‘देवानं जीवन दिलं. आईनं जन्म दिला आणि मोदींनी नवं आयुष्य दिलं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून बेकायदेशीररित्या स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना (मुस्लिम वगळून) भारताचं नागरिकत्व देण्याचा सुधारित कायदा केंद्र सरकारनं केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतीच या संदर्भातील विधेयकास मंजुरी देण्यात आली. मात्र, या कायद्यास देशभरात विरोध होत आहे. सुधारित कायदा राज्यघटनेच्या गाभ्यालाच तडा देणारा आहे, असा आरोप होत आहे. त्या विरोधात पुरोगामी विचारवंत, विद्यार्थी व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अटकसत्र सुरू आहे. सरकारचा निषेध होत आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे.