राज्यात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास सरकार तयार असल्याने शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. यासाठी दोन एजन्सीजची देखील निवड करण्यात आली आहे. TAIT द्वारे शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल दरम्यान यासाठी वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शिक्षक पदाच्या नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून प्रश्नोत्तराच्या तासावेळी उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन खासगी एजन्सींना भरतीचे काम देण्यात आले आहे. या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि त्या विश्वासार्ह आहेत, असे ते म्हणाले. शिक्षक भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील शैक्षणिक वर्षात हे शिक्षक रुजू होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
शिक्षण विभागाकडून २०१२ पासून पूर्ण क्षमेतेने शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काहीजण निवृत्त झाले आहेत. आहेत त्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे.