मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार– सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत
मुंबई, दि. 3 : राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, अनिल देशमुख, रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.आरोग्य मंत्री श्री. सावंत म्हणाले, हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा – सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे 2024 पर्यंत पूर्ण करणार
गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे 2024 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-60’ उपक्रमातील नव उद्योजकांची मुलाखत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-60’ उपक्रमातील नवउद्योजक विकास आवटे व सायली मराठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 4 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे ‘बिझनेस अॅक्सिलेटर’ स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून ‘कॉर्नेल महा-60’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संवाद साधला आहे. या मुलाखतीत विकास आवटे व सायली मराठे या नवउद्योजकांनी उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आष्टी’च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
*****
दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे 2022 अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. 3 : चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील 7 किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.