मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. या पहाटच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे खळबळ उडालीय. अजित पवारांसोबत झालेला शपथविधी शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही’, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते-
माझा 2 वेळा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंकडून झाला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांनतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.
अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. मात्र त्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या आणि अजित पवार कसे तोंडघशी पडले हे तेच सांगतील. जर त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”, असेही फडणवीसांनी सांगितलं.

