जळगाव, (प्रतिनिधी)- इंदोर वरून अमळनेर जाणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून इंदोर वरून अमळनेर जाणाऱ्या एसटी बस थेट नर्मदा नदीत कोसळली सदर अपघात मध्य प्रदेशातील धारमध्ये झाला आहे.एसटी महामंडळ अमळनेर आगारातील बस असल्याचे समजते.
याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत, त्यांचे प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180,02572217193,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत कार्यावर लक्ष ठेवून
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेला अपघात ही अतिशय दुःखद घटना असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.अपघाताचे वृत्त कळताच मी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ChouhanShivraj शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये
मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही सूचना दिल्या आहेत. तसेच या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन दुर्घटनेबाबत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.