मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. तर पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून यामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९६३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. राज्यात पावसामुळे एकूण १४ एनडीआरएफ टीम आणि ६ एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे ६५ किमी प्रतितास वाहण्याची शक्यता आहे.
नागपुरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर येथे काही ठिकाणी, अमरावती, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.