पाटणा : प्रेम हे अशी गोष्ट आहे ते कधी कुठे कोणावरही होऊ शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. अशातच एक अजब प्रेम की गजब कहाणीचा एक विचित्र प्रकार पाटणामधून समोर आला आहे. येथे दोन मुली एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकींना भेटल्या आणि मग मैत्री इतकी वाढली की दोघींनीही एकमेकींसोबत जगण्या-मरण्याचा निर्णय घेतला.
दोघी एकमेकींच्या इतक्या प्रेमात पडल्या की त्यांनी सामाजिक बंधनं तोडून समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित केलं. आता दोघींनाही लग्न करून एकमेकींची आयुष्यभर साथ द्यायची आहे. मात्र, दोघींचेही कुटुंबीय यासाठी तयार नाहीत.
22 वर्षीय श्रेया घोष आणि तनुश्री या दोघींची मैत्री अनेक दिवसांपासून आहे. श्रेया घोष ही पाटण्यातील पाटलीपुत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर तनुश्री दानापूरमध्ये राहते. पाटणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 4 दिवसांपूर्वी पाटलीपुत्र पोलीस स्टेशन हद्दीतील एका मॉलमध्ये दोन्ही मुली सापडल्या होत्या आणि नंतर तिथून पळून गेल्या होत्या. यानंतर तनुश्रीच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असतानाच दोघीही दिल्लीला पळून गेल्या. मात्र श्रेया घोषने आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबीयांना सतत टॉर्चर केलं जात होतं, अशात गुरुवारी दोघी दिल्लीला निघून गेल्या. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, ‘काका विशाल वर्मा आणि मामा अंबर कश्यप यांनी केस दाखल करत श्रेया घोषने माझे अपहरण केल्याचा आरोप केला आहे, मात्र हे सत्य नाही. मी श्रेयासोबत स्वेच्छेने आले आहे, असं ती म्हणाली आहे.
काका आणि मामा मला सतत धमक्या देत आहेत. आम्ही एकत्र आलो तर ते आम्हाला जीवे मारणार आहेत. यासोबतच श्रेयाच्या कुटुंबीयांनाही वाईट पद्धतीने त्रास देत आहेत.’
तनुश्री म्हणते की ‘आम्ही दोघीही मुली असलो तरी आम्हाला एकत्र रहायचं आहे. आम्हाला लग्न करायचं आहे, कायद्याने परवानगी दिली तर आम्ही तेच करू. दोघींचाही आरोप आहे की त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आला असून त्यांच्या घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एक दिवशी घरातील लोक चित्रपट बघायला गेले होते, तेव्हा मी माझ्या इच्छेने श्रेयाला कॉल करून मॉलमध्ये बोलावलं आणि मग आम्ही दोघी एकत्र पाटण्याहून दिल्लीला निघालो.’ तनुश्री म्हणते की काहीही झालं तरी तिला श्रेयासोबत राहायचं आहे.