औरंगाबाद: 25 वर्षीय इंजिनिअर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील घडली. निखिल दत्तात्रय चौडांळे ( रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्रं आढळून आली आहे. निखिलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा पंढरपूर येथील निखिल चौडांळे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगर मध्ये राहत होता.
दरम्यान, आज सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबत माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी निखिलचा मृतदेह ताब्यात घेऊन पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे. तर माहिती मिळताच निखिलचे नातेवाईक पंढरपूर येथून पैठणकडे रवाना झाले आहेत.
खोलीत सापडलं प्रेमपत्र…
निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्रं आढळून आली आहे. तर एका प्रेमपत्रात ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत.पोलिसांनी आता ही सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर या युवकाने नेमकी आत्महत्या का केली? त्याचे कुठल्या युवतीबरोबर प्रेमसंबंध होते का? या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.