नाशिक,(प्रतिनिधी)- येथून जवळचं असलेल्या देवळाली ते लहवी रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी होणार असून या रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाला खोळंबा लागला आहे.
एसटी संप… त्यात रेल्वे गाड्या रद्द
रेल्वे अपघातामुळे पंचवटी एक्स्प्रेसह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन एसटी संपात प्रवाशाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
काल दिनांक 4 रोजी रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनिल जयनगर पवन एक्स्प्रेस चे चार डबे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
या तंत्रज्ञानामुळे अपघाताची तीव्रता कमी
रेल्वेतील ‘एलएचबी’ या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर आदळत नाहीत. ते विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. अधिकचे नुकसान टळते. त्याचाच प्रत्यय नाशिक येथील अपघातात आला. मात्र, हा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. लवकरच रेल्वेतर्फे या अपघाताबाबत ठोस माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, या अपघाताने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवासांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे.
पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस,12146 पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस,12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस, 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस, 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, 17612 मुंबई – नांदेड एक्स्प्रेस,17611 नांदेड – मुंबई एक्स्प्रेस, 17617 – नांदेड – मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे.