कोटा : राजस्थानमधील कोटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. वऱ्हाडाची कार एका अरुंद पुलावरून चंबळ नदीत कोसळली. यामध्ये नवरदेवासह नऊ जणांना मृत्यू झाला आहे. यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोटा येथील नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंबळमध्ये ही घटना घडली आहे. लग्नाआधीच नवरदेवाला मृत्युने गाठले आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील बरवाडा भागातून ते उज्जैनमध्ये लग्नासाठी निघाले होते, अशी माहिती कोटा पोलिसांनी दिली आहे.
कारवरील नियंत्रण सुटल्याने रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघाताची माहिती कुणालाही नव्हती. पण कोणीतरी रात्रीच्या कार नदीत कोसळताना बघितलं होतं. यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कोटा पालिकेचे बचाव पथकही बोलवले गेले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. तसंच क्रेनच्या सहायाने नदीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली आहे. ज्या पुलावरून कार नदीत कोसळली तो ब्रिटिशकालीन म्हणजे १०० वर्षे जुना पूल आहे.