मुंबई : गेल्या काही दिवसापासून नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा हातपाय पसरवू लागला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नाही. केवळ निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत सरकार काम करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी त्यांनी मुंबईतील करोना परिस्थिती गंभीर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.
मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
तूर्तास लॉकडाऊन नाही
“राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकारनं केलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची तब्बल दोन तासाहून अधिक काळ बैठक झाली. यात लॉकडाऊनचा विषय देखील निघालेला नाही. पण निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसंच सध्या लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे लक्ष देण्यावर भर असणार आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.
“राज्यात बेड्स आणि ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसारच निर्बंधांबाबचे पुढील निर्णय घेतले जातील. ज्यादिवशी राज्यात ७०० मेट्रीक टनपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा राज्य ऑटोमोडमध्ये लॉकडाऊनमध्ये जाईल. पण सध्या तसा अजिबात विषय नाही. लॉकडाऊन म्हटलं की त्याचा थेट अर्थकारणावर परिणाम होतो. हातावर पोट असलेल्यांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे लॉकडाऊनचा कोणताही विषय सध्या झालेला नाही”, असं राजेश टोपे म्हणाले.