मुंबई: मागील गेल्या महिन्याभरापासून एसटीच्या विलीनीकरणावरून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. भरघोस पगारवाढ करूनही संप सुरूच आहे. त्यामुळे एकूण दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची घोषणा केली.
सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
ते म्हणाले की, सरकारने कर्मचाऱ्यांची वाढीव पगार वाढीची मागणी मान्य केली. आतापर्यंत सर्वात मोठी पगारवाढ देण्यात आली. यानंतरही काही आगारातील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. पण, त्यांना आता सरकार अखेरची संधी देत आहे. अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून ही माहिती दिली.
आम्हाला कामावर यायचं आहे. पण काही लोक येऊ देत नाही असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कामगार कामावर यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ. जो डेपो 50 टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ. पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.
तर पोलीस ठाण्यात तक्रार करा
आम्ही कारवाईबाबत पुढे गेलो आहोत. सोमवार नंतर कठोर कारवाई होऊ शकते. सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावं. निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावं. मला संधी दिली नाही असं वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत. कामगारांना अडवलं गेलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं. जेणे करून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल, असं सांगतानाच तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कामगार कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.