जळगाव प्रतिनिधी | जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेवून जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापाऱ्यांचा चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच तरुणांनी निर्घूण खून केला आहे. स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वप्नील रत्नाकर शिंपी हे दुकानावरील कामगार दिलीप राजंद्र चौधरी (रा. फरकांडे) यांच्यासोबत कारने (एम.एच. ०१ ए.एल. ७१२७) कासोदा येथून जळगाव येथे आलेले होते. सायंकाळी जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेतल्यानंतर ते घराकडे जात असताना त्यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करुन पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होवू न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडींवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बंॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला रुग्णवाहिकेत जळगावला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.