जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीमाजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात सहभागी झालेली भाजपची नेतेमंडळी एका ट्रॅक्टरवर उभे राहून मोर्चात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी ७ ते ८ हजार लोकांचा जमाव जमला होता. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले.
यांच्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, आ. संजय सावकारे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.