औरंगाबाद प्रतिनिधी | ‘माझे दहावीचे वर्ष आहे, मात्र अभ्यास समजत नाही, पाठांतर केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येक जण मला बोलतो, मित्रही हसतात…,’ असा मजकूर वहीत लिहून निखिल सुनील लोळगे या १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार समोर आला.
औरंगाबादच्या सिडको परिसरातील एन-९ मध्ये राहणारा निखिल इयत्ता दहावीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत आहेत, तर आई गृहिणी आहे. निखिल याला एक लहान भाऊ आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने निखिल ऑनलाइन शिक्षण घेत होता. शुक्रवारी दिवसभर ऑनलाइन क्लास आणि अभ्यास करून त्याने रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी निखिल खोलीतून बाहेर न आल्याने आई त्याला उठवण्यासाठी गेली.
मात्र तेव्हा निखिल खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने आई जोरात किंचाळली. आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनी निखिलच्या खोलीकडे धाव घेतली. सिडको पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. निखिलला खाली उतरवून घाटीत दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झालेला होता. शवविच्छेदनानंतर निखिलचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान निखिलने त्याच्या वहीत आत्महत्येचे कारणही लिहून ठेवले. ‘माझे दहावीचे वर्ष आहे, मात्र अभ्यास समजत नाही, पाठांतर केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येक जण मला बोलतो, मित्रही हसतात…,’ ही व्यथा त्याने वहीत लिहून ठेवली. यावरून निखिल अभ्यासाच्या तणावाखाली होता, हे दिसून येते. या प्रकाराने विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.