औरंगाबाद: मराठवाड्यात गेल्या काही दिवसात सुरु असलेल्या सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अशात औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात नुकत्याच एका शेतकरी पत्नीने कर्ज, पिकांचे नुकसान आणि भविष्याची चिंता यापायी आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. ताराबाई कल्याण शेळके असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.
याबाबत असे कि, गंगापूर तालुक्यातील ताराबाई कल्याण शेळके यांचे दोन मुले, मुलगी व पती असे कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून होते. काही महिन्यांपूर्वी शेळके कुटुंबाने शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यात ताराबाई यांच्या मुलीच्या लग्नाचीही चर्चा सुरु होती. पण कुटुंबाच्या डोक्यावर आधीच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचं ओझं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतीतूनही अपेक्षित असं उत्पन्न मिळत नव्हतं. या संकटांना तोंड देत असतानाच पोरा-बाळांचं आयुष्य तरी मार्गी लावावं, असं ताराबाईंना वाटत होतं. त्यासाठी घरातील मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. याची आशा लागून असतानाच गावात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सतत मुसळधार पावसाचा मारा सुरु आहे. त्यामुळे शेळके कुटुंबाच्या शेतीतचे होते-नव्हते ते सर्व पिक नष्ट झाले. त्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे तणावात होते.
कुटुंबात एकावर एक संकट आदळत असल्याने ताराबाई शिंदेंचं कुटुंब तणावात होतं. बुधवारी ताराबाई कुटुंबासह शेतात काम करत होत्या. दुपारी मुलगा घरी गेला. मात्र संध्याकाळपर्यंत आई घरी न आल्याने मुलगा चुलत भावाला घेऊन तिला शोधण्यासाठी शेतात गेला तेव्हा ताराबाई दिसून आल्या नाहीत. अधिक शोध घेतला असता अचानक विहिरीजवळ त्यांना चपला दिसल्या. आत डोकावून पाहिले असता ताराबाई आढळल्या. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निदान आपल्या मुला-बाळांचे कल्याण होईल, या आशेने धडपडणाऱ्या या माऊलीने अखेर मृत्यूलाच कवटाळले. यामुळे संपूर्ण कुटुंबच पोरकं झालं आहे.