चाळीसगाव प्रतिनिधी : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, गेल्या ३० दिवसांत चाळीसगावमधील डोंगरी आणि तितूरला पाचव्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारात शिरले आहे. याशिवाय अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
ढगफुटीमुळे गेल्या महिन्यात चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे. यातच काल रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे.
या पुरामुळे नव्या आणि जुन्या गावचा संर्पक तुटला आहे. तर दुसरीकडे देवळी गावाजवळ चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम सुरु असल्याने कडेला असलेला भराव मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.
जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीलाही मोठा पूर आला आहे. वाकोद, पहूर व नेरी गावातून वाहणारी वाघूर नदीही खळाळली आहे. उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेरमधून वाहणाऱ्या कांग नदीलाही पूर आला आहे.