बारामती : तालुक्यातील अंजनगाव इथं मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पिण्यासाठी पाणी काढत असताना ही हृदयद्रावक घटना घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली. अश्विनी सुरेश लावंड (वय ३५), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चारण्यासाठी जातात. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीने पिण्यासाठी पाणी काढायला समृद्धी शेततळ्याच्या बाजूला गेली होती. त्यावेळी शेततळ्यात वापरलेल्या प्लास्टिक कागदावरून तिचा पाय घसरला. मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला. त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र, ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले.