अमळनेर : अमळनेर तालुक्यात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं एका बालिकेला प्राण गमवावा लागला आहे. आरुषी सुरेश भिल (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
याबाबत असे की, अमळनेर येथे मुसळधार पावसाने रात्रीपासून बोरी नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील सात्री गावाचा संपर्क तुटला आहे. नेमके याचवेळी तापामुळे आजारी असलेल्या आरुषी भिल हिला अत्यवस्थ वाटू लागले. म्हणून तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई-वडिलांनी केली.
पण नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. अखेर, ग्रामस्थांनी एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. तरी देखील उशीर झाल्याने दवाखान्यात पोहचेपर्यंत आरुषीची प्राण ज्योत मालवली. निष्काळजी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
सात्री गावाचे ८ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. बोरी नदीला पूर आला तर गावातून बाहेर निघायला रस्ता नाही. दोन दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी यांनी नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट दिली होती. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत. पुरामुळे रस्ता नाही. अशा परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात कसे नेऊ? प्रशासनाने गावात डॉक्टर पाठवावेत, अशी मागणी बोरसे यांनी केली होती.