एरंडोल प्रतिनिधी : राखी पौर्णिमेच्या दिवशीच एरंडोल तालुक्यातील जळू येथील दोन तरुणांवर काळाने घाला घातला. पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघं युवकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना भालगाव फाट्याजवळ मध्यरात्री घडली.
इंद्रसिंग दगडू पाटील (वय २८) आणि भूषण कौतिक पाटील (वय २२) असे अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, इंद्रसिंग पाटील आणि भूषण पाटील हे दोन्ही रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एरंडोलकडून मोटर सायकल (क्र. एमएच. २०, एफक्यू ७५०५) ने घरी जळू येथे येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटर सायकलला पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र. एमएच १९, झेड. ४५२७) ने समोरून जोरदार धडक दिली.
यात मोटरसायकलवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला. अपघातानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, पोलीस कर्मचारी अकिल मुजावर, संदीप सातपुते, अनिल पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी तसेच पातरखेडे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
दोन युवकांचा अकाली अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. याबाबत नरेंद्रसिंग भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्हीही करत होत परिवाराचा उदरनिर्वाह
अपघातात मयत झालेला भूषण औरंगाबाद येथे कंपनीत नोकरीस होता. त्याच्या पच्छात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर इंद्रसिंग पाटील हा शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पच्छात आई, भाऊ, पत्नी व तीन वर्ष वयाचा मुलगा आणि एक वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे. घरातील दोन कर्त्या युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.