जळगाव ;- जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून संपूर्ण जळगांव जिल्हयात दिनांक ४ मे रोजी रात्री १२ वाजेपासून पासून ते दिनांक 17 मे रोजीच्या रात्री १२ वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत .
आदेश पुढीलप्रमाणे 1) जळगांव जिल्हयात नमूद कालावधीत कोणतीही व्यक्ती / नागरीक यांना सायंकाळी 07.00 ते सकाळी 07.00 वाजेपावेतो अत्यावश्यक बाब वगळता, अनावश्यकरीत्या फिरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा व अत्यावश्यक सेवा वगळता )
2) 65 वर्षांवरील जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील बालके, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच रहावे. तथापि अत्यावश्यक से वा, वैद्यकीय सेवा घेण्याकरीता संबंधितांना मुभा असेल.
3) जळगांव जिल्हयातील घेण्यात येणा-या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरण्यास बंदी घालण्यात येत आहे.
4) जळगांव जिल्हयात कोणतीही व्यक्ती / नागरीक यांना सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. तसेच उघडयाव अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. तथापी सदरील बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले आहे.