नवी दिल्लीः- दिल्लीत ‘टाइम्स नाउ समिट’ आयोजित करण्यात आले आहे. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन भारताचे विचार मांडत आहेत. गेल्या ८ महिन्यांत सरकारने निर्णयांचे शतक केले. शेतकऱ्यांना भत्ता, दिल्लीतील २५ लाख नागरिकांना घरांवर अधिकार देणारा कायदा, ट्रान्सजेंडरांना अधिकार देणारा कायदा, नॅशनल मेडिकल कमिशन अॅक्ट, रस्ते अपघातांना आळा घालणारा कायदा, बोडो शांती समझोता, भव्य राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट बनवणे, असे निर्णय सरकारने घेतले, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. कलम ३७० हटवण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्र शासित प्रदेश आणि सीएए लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असं मोदी म्हणाले.
हे दशक स्टार्टअपचे असणार आहे. भारत जागाचे नेतृत्व करणार आहे. हे दशक वॉटर इफिशियंट आणि वॉटर सफिशियंट भारताचे असेल. हे दशक १३० कोटी जनतेच्या स्वप्नांचे आणि विश्वासाचे असेल, असं मोदींनी सांगितलं. सरकारच्या चुका नक्कीच दाखवा. पण देशातील नागरिकांना जागरूकही करा. देशाला दिशा देणाऱ्या विषयांबाबत जागरूक करायला हवे, असं मोदी म्हणाले. ज्या प्रकारे माध्यमांनी स्वच्छ भारत, सिंगल युज प्लास्टिक हे अभियान चालवले तशाच प्रकारे जागरूकतेसाठी सतत अभियान सुरू ठेवले पाहिजेत. आपल्याला देशासाठी जगायचंय. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आठवा आणि काम करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.














