नवी दिल्ली – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाइट बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या प्रवाशांसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवारीच अधिकृत मंजुरी देत भाडेवाढीचा मार्ग खुला केला. यानंतर लवकरच नवी भाडे कसे असणार याची औपचारिक माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून जाहीर केली जाणआर आहे.
भाडेवाढीच्या समर्थनासाठी जागृती मोहिमही राबवणार रेल्वे
टीओआयच्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे भाडेवाढ करण्यासाठी एक नवीन धोरण तयार करत आहे. पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच नवीन धोरण तयार केले जाणार आहे. यामध्येच नवीन भाडेवाढ लागू केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वे ही भाडेवाढ का करत आहे, यासंदर्भात लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी एक मोहिम देखील राबविली जाणार आहे.
आर्थिक मंदीचा फटका
देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे कितीही नकारले जात असले तरीही रेल्वेला याचा फटका बसला आहे. या मंदीने रेल्वेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सोबतच, निर्धारित केलेला महसूल गोळा करण्यातही रेल्वेला अपयश हाती लागले आहे. इतर कारणांपैकीच एक महत्वाचे कारण म्हणून यात चांगल्या रस्त्यांना दोष दिला जात आहे. महामार्ग आणि रस्ते चांगले झाल्याने रेल्वे प्रवास कमी झाला असाही तर्क दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर दोष आरोपांच्या यादीमध्ये विमानसेवेला देखील दोष दिले जात आहे. विमान सेवा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या चांगल्या ऑफर्समुळे अनेकांनी रेल्वेकडे पाठ फिरवली असे सांगितले जात आहे. या सर्वच कारणांचा तपशील आता रेल्वे आपल्या ग्राहकांना सांगण्याच्या तयारीत आहे.














