अहमदनगर – महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार म्हणून विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांची राजकीय कोंडी झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हळूहळू स्थिरावत असल्याने हे राजकीय नेते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच काही नेत्यांनी परतीच्या प्रवासाची चाचपणी सुरू केली असून भाजप नेते राधाकृष्ण पाटील हे नाव त्यात सर्वाधिक चर्चेत आहे. राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर श्रीरामपुरात जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून हा उद्घाटनाचा कार्यक्रम अनेक चर्चांना तोंड फोडणारा ठरला आहे.
विखेंच्या श्रीरामपुरातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास पक्षविरहित स्वरूप होते. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर ‘चलो एक पहल की जाए…नए रस्ते की ओर…’ असे एक वाक्य लिहिलेले होते. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विखे यांच्याविरूद्ध पक्षातील पराभूत आमदारांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अद्याप सुरुच आहे. तर दुसरीकडे मधल्या काळात विखे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता हा नवा रस्ता कोणता, अशी चर्चा नगर जिल्ह्यात रंगली आहे.















