
जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहर मतदार संघातून जिल्यात सर्वाधिक मताधिक्य घेत दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात “राज्यमंत्री” पदी वर्णी लागून संधी मिळू शकते व भाजपा प्रती लेवा समाजाची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
आ. राजूमामा भोळे हे जळगाव शहर मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहे, महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे, संकट मोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निकटवर्तीय असून आ. राजुमामांच्या कामावर मुख्यमंत्री फडणवीस देखील खुश आहेत ही जमेची बाजू आहे तर जिल्यातील लेवा समाजाची नाराजी देखील दूर करण्यासाठी आ.राजूमामा भोळे यांना मंत्रीमंडाळात स्थान दिले जाऊ शकते.
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यवर गेल्या मंत्रिमंडळात असतांना विविध भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर भाजपने त्यांचा राजीनामा घेत सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत खडसेंना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले तर खडसेंना विधानसभेची उमेदवारी सुद्धा भाजपने नाकारून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना देण्यात आली.मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत करत चुरस निर्माण केली.चुरशीच्या लढतीत मात्र रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला.तर रावेर मतदार संघातून जेष्ठ असलेले भाजपाचे आमदार हरिभाऊ जावळे यांना देखील भाजपच्याच बंडखोर उमेदवारामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.या लेवा समाजाच्या दोन्ही नेत्यांना भाजपनेच संपवल्याची भावना लेवा समाजात आहे.
जर यावेळी मुक्ताईनगर मधून एकनाथराव खडसे, रावेर मधून हरिभाऊ जावळे हे निवडून आले असते तर ते मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार असते.म्हणून कदाचित त्यांना सोयीस्कर पणे या निवडणुकीत डावलण्यात आले अशी भावना लेवा सामाज्यात पसरल्याने लेवा समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.समाजाची हीच नाराजी दूर करण्यासाठी जळगाव शहर मतदार संघातून दुसऱ्यांदा मताधिक्याने निवडून आलेले आ.राजूमामा भोळे यांना आगामी मंत्रिमंडळात राज्यमंत्री संधी देऊन प्रयत्न केले जाऊ शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.














