नवी दिल्ली – बेरोजगारी आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवरून विरोधकांकडून सरकारला वारंवार लक्ष्य केलं जात आहे. मात्र, यावर्षी केंद्रातील एक लाखांहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. २०१९-२०मध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन कमिशन) माध्यमातून १ लाख ५ हजार ३३८ पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह राज्यसभेत दिली.
१ मार्च २०१८ पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांतील जवळपास सात लाख पदे रिक्त आहेत. ग्रुप सीमधील ५ लाख ७४ हजार २८९ पदे रिक्त आहेत, ग्रुप बीमधील ८९ हजार ६३८ पदे रिक्त आहेत, तर ग्रुप एमधील १९ हजार ८९६ पदे रिक्त आहेत. एकूण ६ लाख ८८ हजार ८२३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती सिंह यांनी राज्यसभेत दिली.
जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, ‘२०१७-१८ या कालावधीत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डतर्फे (आरआरबी) सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनद्वारे (सीईएन) १ लाख २७ हजार ५७३ पदांसाठी भरती होणार असल्याचं जारी करण्यात आलं. याव्यतिरिक्त २०१८-१९मध्ये ग्रुप सी आणि लेव्हल -१मधील पदांसाठीही नोटिफिकेशन जारी करण्यात आले. त्याद्वारे १ लाख ५६ हजार १३८ पदे भरली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. एकूण ४ लाख ८ हजार ५९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.’
प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी १ जानेवारी २०१६ पासून अनेक पदांसाठी मुलाखती बंद करण्यात आल्या होत्या. बहुतांश परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षित रिक्त पदांची संख्याही मोठी आहे, अशी माहितीही जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.














