बारामती – आम्ही सर्वच जण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहोत, महाविकास आघाडी ही तिन्ही वरिष्ठ नेत्यांच्या समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्र आलो आहे. विविध विषयांवर विविध मतभेद असू शकतात. मात्र महाविकास आघाडी अभेद्य आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचे मतदान केल्यानंतर ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्पर भिन्न मतं व्यक्त केली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असून सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याकडं लक्ष वेधलं असता पवार म्हणाले, सरकारमध्ये फूट पडणार नाही. महाविकास आघाडी ही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आली आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहोत. विविध विषयांवर मतभेद असू शकतात. मात्र, महाविकास आघाडी अभेद्य आहे.















