नवी दिल्ली – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार येणार की विरोधकांची सरशी होणार याबद्दलचा सस्पेन्स आणखी एक दिवस कायम राहणार आहे. फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीला आव्हान देत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडं लागलं आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं रातोरात अजित पवारांना फोडून नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी मिळाली. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच महाविकास आघाडीनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला आमंत्रित करण्याचे आदेश राज्यपालांना द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या तातडीच्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भाजपला सत्तास्थापनेच्या दाव्याची पत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पुढील सुनावणी झाली.














