रांची – भाजपच्या खांद्यावरच बसून शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवले असे विधान केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बुधवारी ते बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून सर्वात मोठा पक्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर केले.
महाराष्ट्रातील आघाडी संधीसाधूपणाचा कळस -रवीशंकर प्रसाद
झारखंडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर टीका केली. “महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत दिले होते. तर हरियाणात भाजपला जनतेने कौल दिला. यानंतर भाजपने जेजेपीसोबत मिळून सत्ता स्थापित केली. महाराष्ट्राबद्दल बोलावयाचे झाल्यास तेथे जनतेने युती सरकार सत्तेवर आणण्यासाठी मतदान केले होते. तरीही दुसरी आघाडी सत्ता स्थापित करत आहे. अशा आघाडीला केवळ संधीसाधूपणाचा कळस म्हणता येईल.” असे केंद्रीय मंत्री प्रसाद म्हणाले आहेत.















