बालकवी ठोमरे, बहिणाबाई व ना.धों महानोर पुरस्काराचेही वितरण
जळगाव – जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य–कला जीवनगौरव पुरस्कार‘ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर–पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि. सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना समारंभ पूर्वक वितरण होणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मराठी साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरलेले हे पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली, कविवर्य ना.धों. महानोर, सेवादास दलिचंद जैन,जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, यांच्या प्रमुख उपस्थितीत कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ जैन हिल्स येथे वितरीत होत आहेत.
‘भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन‘ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट‘ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 9 सदस्यीय समितीने स्व. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनी 6 सप्टेंबर रोजी जैन हिल्स्् येथे झालेल्या बैठकीत या चारही पुरस्कारांची ही निवड केली गेली होती.
जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगावचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.
तर कांताई जैन साहित्य–कला जीवनगौरव हा व्दिवार्षिक पुरस्कार असून 2 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल–श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्काराचे मानकरी खान्देशातील धुळे गोंदूर येथे जन्मलेले जगप्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. कला आणि साहित्य क्षेत्रातील अखिलभारतीय स्तरावरील कर्तृत्ववान ज्येष्ठ व्यक्तिची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास निवड समितीचे सदस्य डॉ. प्रभा गणोरकर, श्रीमती अनुराधा पाटील, प्रा. राजन गवस, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, संजय जोशी, शंभू पाटील हे निवड समिती सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














